Wednesday 24 January 2018

बदल
बदल हाच काळाचा, समाजाचा आणि व्यक्तीचा स्थायीभाव आहे.
काळ सतत पुढे जात असतो आणि त्यात झालेले बदल मागे नेता येत नाहीत. आणि ते बदल तरी कुठे स्थायी असतात? त्यातही निरंतर सूक्ष्म बदल सतत होत राहतो. गोष्टी इतिहासात जमा होतात आणि कालांतराने वेगळ्या रूपात पुन्हा अवतरतात.
भारताचा इतिहास पाहिला तर इंग्रज यायच्या पूर्वी सर्व भारत छोट्या छोट्या असंख्य राज्यांमध्ये विभागला होता. एकमेकांवर स्वारी करणे, लूट-मार करणे यात धन्यता मानत होते. शेजारी वरचढ झाला तर बाहेरच्याची मदत मागत होते. आपल्याच भाईबंदांना खच्ची करण्यात सार्थक मानत होते. परिणामी त्यांनी बोलवलेला बाहेरचा त्यांचा पण खातमा करत होता.
आज आपण पाहिले तर हेच पण जरा वेगळ्या रूपात चालू आहे. छोट्या राज्यांऐवजी आता जातीय, राजकीय, धार्मिक पार्टी आहेत. प्रत्येक भागात वेगळी. स्वतःच्या संकुचित आणि तात्कालिक फायद्यासाठी काहीही करायला तयार! मग त्यामुळे आपल्या देशाचे, समाजाचे कितीही नुकसान झाले तरी त्यांना पर्वा नाही. देशासाठी तळमळीने कार्य करणार्यां च्या सर्व मेहेनतीवर पाणी पडते आणी देश पुढे जाण्याऐवजी परत १८व्या शतकात ढकलला जातो आहे. काळ कोणाला क्षमा करत नाही. पण काही थोड्या लोकांच्या महत्वाकांक्षेसाठी जेव्हा देश वेठीला धरला जातो तेव्हा काळजी पण वाटते आणि भीतीही!
समाज पण बदलतो. चालीरीती बदलतात. सोयीप्रमाणे त्यांच्यात बदल होत असतो. शेतीप्रधान असलेला आपला देश आता जास्ती जास्ती शहरांकडे चाल करतोय. खेड्यांमध्ये पण आता बर्यापैकी so called प्रगती झाली आहे. आता त्यांना शारीरिक कामाचा कंटाळा आहे. रिकामपणामुळे गुंडागर्दी वाढते आहे. मग दंगे लूट करायला मोकळेपणा आहे. पुढारले पण कशाला म्हणायचे कळत नाही. देशाचा विचार करायला कोणीच तयार नाही. विचारवंतांनी करायला हवे, पण त्यांच्यातही स्वतःचे मोठेपण अहंकार इतका की स्वतः शिवाय दुसरा विचारच नाही!
कौटुंबिक स्तरावर विचार केला तर पूर्वींची एकत्र कुटुंब पद्धती जवळ जवळ नामशेष झाली आहे. छोट्या कुटुंबात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, ज्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सहज सोडवल्या जात होत्या. ज्यामध्ये मुलांचे संगोपन आणि संस्कार मुख्य होते. मानसिक आधार होता. शिक्षण क्षेत्रात प्रगती झाली आहे. पण स्वतंत्र राहण्यामुळे अनेक समस्या पण उद्भवल्या आहेत. पळापळीच्या आयुष्यात एकमेकांसाठी, मुलांसाठी वेळ देता येत नाही. आपण क्वालिटी टाईम म्हणतो, पण आपल्यालाही माहीत असते की ते फक्त आपल्या मनाची समजूत काढणे आहे. आणि हे नवरा आणि बायको दोघांनाही लागू आहे. मानसिक सपोर्ट नाही. परिणाम आपण बघतोच आहोत.
व्यक्तिसापेक्ष विचार केला तर सर्वांचेच राहणीमान, राहण्याची, वागण्याची, कपडे घालण्याची पद्धत बदलली आहे. सुरुवातीला हा बदल सावकाश होता. पण गेल्या दशकात झालेले बदल काळजी करायला लावणारे आहेत. आपली राहणी ८०टक्के पाश्चिमात्य झाली आहे. भाषा पण बदलली आहे. मराठी बोलतांना पण ७५% इंग्रजीचा वापर असतो. कपड्यांबद्दल तर बोलायलाच नको! रस्त्यावरून फिरतांना आपण अमेरिका किंवा युरोपमध्ये असल्यासारखे वाटते! आणि गंमत म्हणजे साध्या सुध्या भारतीय सलवार कमीज घातलेल्या मुलींचीच ते कींव करतात! त्यांना पायी अथवा सायकलवर जाणे कमीपणाचे वाटते! जिम मध्ये जाऊन सायकल करतील, जोग्गिंग जरतील, पण कॉलेजला कोपर्यापवर असेल तरी आवाज करणार्या मोबाईकवर जाणार! सगळेच असे असतात असे नाही, पण जास्त प्रमाणात असेच असतात.
बदल व्हावेत. बदल चांगले असतात पण ते जर विचारपूर्वक स्वीकारले तर समाज पुढे जाईल. सर्वांनीच विचार करण्याची आवश्यकता आहे.

No comments:

Post a Comment